Sharad Pawar VS Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांच्यावरून झालेल्या आरोपांवर शरद पवारांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

Sharad Pawar VS Devendra Fadnavis : मनोज जरांचे यांच्यावरून झालेल्या आरोपांवर शरद पवारांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट बोलत असल्याचा आरोप केलाय. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. “खरं सांगायचं झालं तर जबाबदार लोकांचं वक्तव्य जबाबदार असलं पाहिजे. जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचे वक्तव्ये पाहिले.

जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचं गेलं तर त्यांचं उपोषण सुरु झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो. मी त्यांना भेटून एवढंच सांगितलं होतं की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करु नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य टिकेल, असं करा. तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो. पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झालाय. त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही. असं असताना उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असभ्य वाटतंय”, अशा शब्दांत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारला असता “राजेश टोपे यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. मला माहिती आहे, राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार त्यांची मदत घेत होते. कारण त्यांचे ते शेजारी आहेत. एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर आरोप करणं ही भूमिका असेल तर काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवेल?”, असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर आता त्यांच्या आदोलन प्रकरणात एसआयटी चौकशी लावली जाईल. यातून कोणत्या पक्षाचा यात हात आहे ते तपासलं जाईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सांगितलं. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं. “एसआयटी चौकशी आवश्य करा. एसआयटी करा. वाटेल ती चौकशी लावा आमची काही हरकत नाही. कर नाही त्याला डर कसला. संबंधच नाही. ते म्हणतात फोन आले. मी मनोज जरांगेंना एक फोन जरी केल्याचं सिद्ध केलं तर मी वाटेल ते मान्य करेन”, असं शरद पवार रोखठोक म्हणाले.