सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला ‘रायझिंग भारत रिअल हिरोज २०२४’ पुरस्कार

पुणे : शहरातील सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संस्थेला ‘रायझिंग भारत रिअल हिरोज २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उदयोन्मुख स्टार्टअप समूह आणि नाविन्यपूर्ण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत ग्राहकाभिमुख उत्पादने व सेवा पुरविण्याच्या सूर्यदत्तच्या कटिबद्धतेबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ट्रेड अँड मीडिया ग्रुपतर्फे नुकतेच या सन्मान सोहळ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे केले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमा मालिनी व भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही उत्पादन, आयटी, ऍग्रो फूड्स, बायोटेक, आर्थिक व्यवस्थापन, डिजिटल सोल्यूशन्स, सेवा क्षेत्र आदी क्षेत्रात कार्यरत आहे.
कोरोना महामारीच्या काळात २०२० मध्ये सूर्यदत्त ॲग्रो फूड एंटरप्रायझेस, सूर्यदत्त इन्फोटेक, आदिबाबा इंडिया, सिद्धांत इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, सूर्यदत्त इंडो ग्लोबल एलएलपी, सूर्यदत्त वेल्थ मॅनेजमेंट या स्टार्टअपची सुरवात करत उद्योग उभारण्याचा हा उपक्रम सुरु करण्यात आला. संशोधक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वुमेन्स एम्पॉवरमेंट लीडरशिप अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उदयोन्मुख उपक्रमांची सुरुवात झाली.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आमचे सगळेच औद्योगिक उपक्रम व्यवसायिकदृष्ट्या तज्ज्ञ व ज्येष्ठ मंडळींच्या नेतृत्वात यशस्वीपणे सुरु आहेत. २०५० पर्यंत औद्योगिक कार्यांसाठी सुमारे ५०० क्षेत्रात विस्तार अपेक्षित आहे. सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा दृष्टीकोन हा एक जागतिक दर्जाचा व्यवसाय समूह बनून स्वावलंबनाद्वारे जीवन समृद्ध करणे, शाश्वत मूल्य निर्मितीद्वारे पायाभूत सुविधांच्या उभारणीत राष्ट्राला योगदान देणे आणि चांगुलपणासह वाढीचा समतोल राखणे आहे. पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असल्याने, कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार, सरकारी धोरणांनुसार आणि योग्य परिश्रम आणि बाजार संशोधनानंतर, भारतातील प्रमुख राज्यांसह जगभरात शाखा स्थापन करून व्यवसायात विविधता आणण्याची योजना आहे.”